नवी दिल्ली : येत्या २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असली तरी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहावे लागणार आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत या दिवशी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छतेची शपथ’ दिली जाणार आहे़ कार्यालयात यासाठी हजर राहण्याचे आदेश केंद्रीय सचिव अजित सेठ यांनी दिले आहेत़प्रत्येक मंत्रालयाने या राष्ट्रीय स्वच्छता आणि जनजागृती मोहिमेत सहभाग घ्यावा, असे या निर्देशांमध्ये म्हटले आहे़ २ आॅक्टोबरपासून देशात ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा शुभारंभ होत आहे़ घरापासून, सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालये, रस्ते, बाजार, बसस्थानक, रेल्वेस्थानक, नद्या, तलाव व अन्य सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यात प्रत्येकाचे योगदान असावे, यात सर्वांनी हिरीरीने सहभाग घेण्याचे आवाहन सेठ यांनी केले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
२ आॅक्टोबरला ‘नो हॉलीडे’
By admin | Published: September 27, 2014 6:54 AM