दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर आता आपच्यापंजाबमधील सरकारबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांवर विधानसभेचे अधिवेशन आलेले असताना काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षातही चलबिचल सुरू झाल्याचे दिसत आहे. आपची आता एकाच राज्यात सत्ता राहिली आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवालपंजाबमध्ये मुख्यमंत्री होतील, या चर्चेंने जोर धरला होता. त्यानंतर आता नवा दावा करण्यात आला आहे.
३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात -बाजवा
काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा म्हणाले की, "आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. भगवंत मान यांच्यासोबत आमदारांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीच्या तुलनेत कमी आमदारांचा पाठिंबा आहे."
"हजारो कोट्यवधी रुपये हवाला मार्गे ऑस्ट्रेलिया आणि इतर दुसऱ्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात सीएलयू आणि मद्य विक्रीतून आलेला पैसा जास्त आहे. दिल्लीचे मॉडेल लुटीचे होते. त्यात त्यांचं प्राविण्य आहे", अशी टीकाही बाजवा यांनी आप सरकारवर केली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आता आपच्या पंजाबमधील सरकारचं काय होणार? याबद्दलही चर्चा सुरू आहेत. पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सध्या सरकार आहे.