शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

7 दिवसांचा प्रवास अवघ्या 23 तासांत... अन् किलीमंजारो गाठले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 08:14 IST

ध्यास, आवश्यक ती मेहनत आणि मनाचा निग्रह, असा त्रिवेणी संगम साधला गेला की आव्हान कितीही मोठे असो, एखादी व्यक्ती ते लीलया पेलू शकते.

ध्यास, आवश्यक ती मेहनत आणि मनाचा निग्रह, असा त्रिवेणी संगम साधला गेला की आव्हान कितीही मोठे असो, एखादी व्यक्ती ते लीलया पेलू शकते. असेच अशक्य वाटणारे एक आव्हान नकुल कुमार यांनी शक्य करून दाखवले आहे. टांझानिया देशातील किलीमंजारो हे तब्बल 5895 मीटर उंचीवर असलेले आव्हानात्मक शिखर त्यांनी सर केलेय. अर्थात हे शिखर जगातील अनेक लोकांनी सर केले आहे. पण त्या लोकांना हे शिखर गाठायला किमान 7 दिवस लागतात. पण नकुल कुमार यांनी हे शिखर अवघ्या 23 तासांत सर केले आहे. त्यांच्या या विक्रमाची प्रेरणादायी गोष्ट त्यांच्याच शब्दांत...

नकुल कुमार गिर्यारोहकइस मॅन ऑफ द वर्ल्ड’ अशी ओळख असलेल्या वीम हॉफ यांना मी २०२० पासून फॉलो करत आहे. आपल्या अंगात अमाप ऊर्जा आहे. आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊनही आपण काही करू शकतो, हा विचार वीम हॉफ मांडतात. मला त्यांचा विचार पटला आणि २०२० पोलंडमध्ये कडाक्याच्या थंडीत किमान कपडे परिधान करून १० दिवसांचा एक कॅम्प मी त्यांच्यासोबत केला. त्यानंतर माझ्या मनाने ध्यास घेतला की आपण स्वतःला आणखी आव्हान देत काहीतरी करायला हवे. त्यातून मग टान्झानिया या देशातील किलीमंजारो हे भव्य शिखर गाठण्याची कल्पना माझ्या मनात आली. मी नियोजनदेखील सुरू केले. पण, नेमका कोविड आल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आणि माझ्या कल्पनेला ब्रेक लागला. लॉकडाऊन संपते न संपते तोच नेमकी पुढच्या वर्षी माझ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. माझा उजवा हात जवळपास निकामी झाला होता. पण, त्यातून मी पूर्ण बरा झालो. दरम्यान, माझे आणखी एक वर्ष वाया गेले. त्यातून सावरल्यानंतर २०२४ मध्ये हे शिखर गाठायचेच असा निर्धार केला आणि मी तयारीला लागलो. योग्य ते शारीरीक प्रशिक्षण, मानसिक फिटनेस आणि आहार यावर मी अनेक महिने काम केले. या गिर्यारोहणाचा सराव करायचा म्हणून मी अनेकवेळा माथेरानला पायथ्यापासून माथ्यापर्यंत सलग फेऱ्यादेखील मारायचो. वांद्र्यातील माऊंट मेरीच्या टेकडीवर सलग अनेक फेऱ्या मारायचो. दिवसाकाठी पाठीवर सामान घेऊन १५० ते १८० मजले इतकी चढाई करायचो. ८ ते ९ तास व्यायाम करायचो. पण, मुख्य मुद्दा होता तो तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा. एवढ्या उंचीवर गेल्यानंतर श्वासावरचे नियंत्रण मिळवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तिथल्या वातावरणाची अनुभूती यावी, याकरिता मी अमेरिकेतून एक सिम्युलेटर तंबू मागवला. या तंबूत मी झोपायचो. कारण या तंबूमध्ये मला तेथील वातावरणाची निर्मिती करता यायची. उन्हाळा, थंडी अशा वातावरणाची अनुभूती घेत शरीराला तयार करीत होतो. जवळपास ४५ दिवस मी या तंबूत झोपलो.

...आणि मग तो दिवस आला. माथेरानच्या पाच पट मोठ्या असलेल्या किलीमंजारोवर चढाई करण्यासाठी मी सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात केली. १८६० मीटरवरून ५८९५ मीटरचा टप्पा मला गाठायचा होता. ही वाट जंगलातून होती. सभोवतालच्या हिरवाईमुळे मला शुद्ध ऑक्सिजन मिळत होता त्यामुळे अधिकच ताजातवाना झालो. एक हजार मीटरचा टप्पा पार केल्यानंतर मी अर्धा तास विश्रांती घेतली आणि परत १ वाजता मी ११ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मार्गक्रमण सुरू केले. २७०० मीटर ते ३७०० मीटरवर पोहोचण्यासाठी मला जवळपास पाच तास लागले. हा प्रवास अत्यंत दमवणारा होता. सायंकाळी सव्वा सहा वाजता सूर्यास्त झाला आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. सोबतीला वाढत जाणारी बोचरी थंडी. आता मी अत्यंत थकलो होतो. एक किलोमीटर अंतरासाठी मला १ तास लागला. जसजसा वर चढत होतो तसतसा श्वासही लागत होता. त्याचे नियंत्रण करणेही अत्यंत महत्त्वाचे होते. पण, मनाचा निर्धार पक्का होता. साडे दहाला मी पोहोचणे अपेक्षित होते ते मी साडे अकरा वाजता पोहोचलो. आता मात्र मला विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. खाऊन मी एक तास झोपलो. २ वाजता उठलो आणि सहा किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी मी चालायला लागलो. या प्रवासातील हा टप्पा सर्वांत कठीण आहे. ४७०० मीटरवरून ५८९५ मीटरवर उभ्या सुळक्यासारख्या शिखरावर चढाई करायची होती. नेमके त्याचवेळी माझ्यासोबत जो गाइड होता, तो आजारी पडला. मग, दुसरा गाइड आला. पहिल्या गाइडसोबत सरत्या काही तासांत चांगले सूर जुळले होते. आता नवी व्यक्ती आणि तिही इतक्या अवघड वळणावर भेटली. तिला मी समजणे आणि माझा अंदाज येणे यात काहीसा वेळ जाणारच होता. जसजसे वर चढायला लागलो श्वास अधिकच फुलायला लागला. मी २ मिनिटे चालायचो आणि अर्धा मिनिट विश्रांती घ्यायचो. असे करत पुढे आल्यानंतर पुढचा टप्पा तर फक्त दगडांचा होता. रॉक क्लायबिंगच करायचे होते. स्टेला या दुसऱ्या सर्वोच्च स्थानी मी अडीच तासांत पोहोचणे अपेक्षित होते तिथे पोहोचायला मला साडे तीन तास लागले. आता ओढ लागली होती शेवटच्या टप्प्याची. हा टप्पा म्हणजे ऊरू... सर्वोच्च शिखर. तिथवर पोहोचण्यासाठी आणखी किमान दीड तास लागणार होता. मला रडायला यायला लागले. ७ ते ८ अंश तापमान आणि जोराचे वारे. फार बिकट अवस्था झाली. मनाचा निर्धार तुटेल असे वाटू लागले. २० पावले मी चालायचो आणि २० सेकंद थांबायचो. असे जवळपास दोन तास सुरू होते.

...अन् अखेर मी शिखर गाठले. त्यावेळी डोळे समाधानाच्या आणि आनंदाच्या अश्रूंनी डबडबलेले होते. ध्येयपूर्ती झाल्यामुळे थकवा तर कुठे पळून गेला समजलेच नाही. घड्याळात वेळ पाहिली तेव्हा लक्षात आले की ज्या प्रवासाला साधारणपणे सात दिवस लागतात तो प्रवास मी २३ तास ५५ मिनिटांत पूर्ण केला आहे. तीन-चार मिनिटांत मग परतीचा प्रवास सुरू केला आणि सहा तासांनी मी बेस कॅम्पला परत आलो. सुमारे ३६ तासांच्या या अथक प्रवासानंतर अखेर मी झोपलो. आपल्या क्षमतेपेक्षा खूप काही आपण करू शकतो. पण, त्यासाठी सातत्यपूर्ण योग्य मेहनत, शिस्त अन् निग्रह असणे गरजेचे आहे.