मुंगेर : बिहारमधील मुंगेरमध्ये जवळपास ८० लोकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील धरहरा भागातील नक्षलग्रस्त कोठवा गावातील आहे. याठिकाणी लोक भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या पूजेनंतर प्रसाद लोकांना वाटण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर जवळपास ८० लोकांची तब्येत बिघडली. प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि लोकांना मदत करण्यास सुरवात केली.
दरम्यान, धरहरा भागातील कोठवा गावात राहणारे महेश कोडा यांच्या घरी भगवान सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजा कार्यक्रमात दलित, महादलित आणि आदिवासी समाजातील शेकडो लोकांनीही भाग घेतला. पूजा संपल्यानंतर सर्वांना खाण्यासाठी प्रसाद देण्यात आला.
प्रसाद खाल्यानंतर लोकांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. हे सर्व पाहून ग्रामीण डॉक्टरांना तातडीने बोलावून दाखविण्यात आले, मात्र काही ग्रामस्थांची प्रकृती बिघडू लागल्यावर ग्रामस्थांनी लडैयाताड पोलीस आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविले.
या घटनेची माहिती मिळताच लडैयाताड पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या टीमसह कोठवा गावात पोहोचले आणि सर्व आजारी लोकांवर उपचार सुरू केले. प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या 15 जणांनी प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.