राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमधून आता आसाममध्ये पोहोचली आहे. शिवसागर जिल्ह्यातून सुरू होऊन ही यात्रा आसामच्या 17 जिल्ह्यांमधून जाणार आहे. यात गुवाहाटी शहराचाही समावेश करण्यात आला असून, यामुळे राजकारण पेटले आहे. यावर, आपण शहरात प्रवेश करण्याची परवानगी देणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी (18 जानेवारी) स्पष्ट केले.
माध्यमांसोबत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बस्वा सरमा म्हणाले, "आम्ही म्हटले आहे की, शहरांमधून जाऊ नका. जो कोणता पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याची परवानगी दिली जाईल. मात्र शहरातूनच जाण्याचा अट्टहास केला गेला, तर आम्ही पोलीस व्यवस्था लावणार नाही. मी सरळ गुन्हा दाखल करेन आणि निवडणुकीनंतर, अटक करेन. सध्या काही करणार नाही."
पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “ही न्याय यात्रा नाही, तर मियां यात्रा आहे. जेथे जेथे मुस्लीम आहेत, तेथे तेथे त्यांची ही यात्रा सुरू आहे.” यावेळी गांधी कुटुंबावर हल्ला चढवताना हिमंता म्हणाले, “माझ्या मते तर देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे गांधी कुटुंब आहे. देशात बोफोर्सपासून ते भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपीला पळवण्यापर्यंत सर्वात भ्रष्ट कुटुंब गांधी कुटुंबच आहे. हे केवळ भ्रष्टच नाही, तर डुप्लीकेटही आहे. त्यांच्या तर घराण्याचे नावही गांधी नाही, आपले डुप्लिकेट नाव घेऊन फिरत आहेत.”