प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वाद निर्माण केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळे राज्यासह देशभरात भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. अयोध्येतील परमहंस आचार्य यांनीही जितेंद्र आव्हाडांना शारा दिला आहे. आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. देव वनवासाला गेला तेव्हा त्याने मांस खाल्ले असे कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेले नाही. त्यांनी कंदयुक्त व मुळाची फळे खाल्ली असे सर्वत्र लिहिले आहे, शास्त्र त्याचा पुरावा आहे. हे विचार निषेधार्ह असल्याचं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अयोध्येचे परमहंस आचार्य म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. प्रभू राम भक्तांच्या भावना दुखावल्या. यावर मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे ते म्हणाले. प्रभू रामाबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास मी त्यांना ठार मारणार असल्याचा इशारा देखील परमहंस आचार्य यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.
आजकाल भावनांना महत्त्व- जितेंद्र आव्हाड-
माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. श्रीराम मांसाहारी होते असं मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीकरता, वाल्मिकी रामायणात जे अयोध्या कंद यातील खंड २२, श्लोक १०२ यात लिहिलंय. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. भाषांतरीत केलेले संदर्भ आहेत. रामायणात जे लिहिलंय त्यावर कुणाचा आक्षेप आहे का तर ते सांगावे. अभ्यासाशिवाय मी कुठलेही भाष्य केलेले नाही. पण आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.