नाशिक : मतदार यादीत नाव नसल्याने आपल्यावर मोठा अन्याय झाला, नव्हे किंबहुना आपल्या मनात असलेल्या पक्षाला मतदान करूच नये यासाठी हे मोठे षडयंत्रच आहे, असा दावा काही नागरिक आणि राजकीय पक्ष करीत असले, तरी प्रत्यक्षात वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांत सुधारणा करण्यासाठी मोहीम राबविली जाते, त्यावेळी उदासीनता दाखविल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. एकीकडे मतदानाचा गतवेळेपेक्षा अधिक उत्साह दिसला, तर दुसरीकडे मतदार यादीत नावेच न सापडल्याने अनेक नागरिक संताप करताना आढळले. मतदार यादीतील ही वगळलेली नावे उच्चभ्रूंचीच होती. इतकेच नव्हे तर विशिष्ट वर्गाचीच नावे हेतुत: रद्द करण्यात आली, असा ठपका ठेवण्यासदेखील मागे-पुढे बघितले गेले नाही. तथापि, या परिस्थितीस आपणच कारणीभूत असल्याचे मात्र कोणालाही जाणवत नाही. निवडणूक आयोगाकडून वर्षातून दोनवेळा मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याचा जाहीर कार्यक्रम राबविला जातो. ज्या मतदान केंद्रावर नागरिक मतदान करतात, अशा ठिकाणीच मतदारयाद्या त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. मतदार यादीत नाव वगळले गेले असेल, स्थलांतर झाले असेल किंवा मतदाराच्या नावात चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध असते. नागरिकांनी या याद्या बघून त्यानुसार विहित अर्ज भरून द्यावे असे आवाहन निवडणूक विभाग माध्यमातून करते; परंतु त्यावेळी मात्र कोणीही मतदान केंद्रांकडे फिरकत नाही. यंदा तर निवडणुकीच्या अगोदर म्हणजे ९ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबविली. मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही ते तपासावे आणि नसेल तर नावनोंदणी करावी, असे आवाहनदेखील करण्यात आले. या मोहिमेत तब्बल ८० हजार नव्या मतदारांनी नावे नोंदवली. परंतु अगोदरच मतदान करणार्या नागरिकांनी निर्धास्त राहून आपले नाव यादीत आहेच, त्यामुळे यादी तपासण्याची गरज काय, अशी भूमिका घेतली. आता निवडणूक दोन दिवसांवर आल्यानंतर मतदार चिठ्ठ्या न आल्याने अचानक सर्वच जागरूक झाले. त्यामुळे नागरिकांची उदासीनताच आता अडचणीची ठरली. त्यामुळे आता मतदान करण्याची खूप इच्छा होती; परंतु मतदान करता आले नाही, अशी ओरड करून काय उपयोग?
मतदार यादीत नाव नसल्याने
By admin | Published: September 27, 2014 11:17 PM