हरीश गुप्ता, नवी दिल्लीबिहारमध्ये नितीशकुमार यांच्याविरुद्ध मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा न करण्याचा निर्णय भाजपश्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपचे संसदीय मंडळच अंतिम निर्णय घेणार असून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कुणाच्याही नावाची घोषणा करू नये असे पक्षश्रेष्ठींना वाटते.सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये या राज्यात विधानसभा निवडणुका होत असून धर्मनिरपेक्ष आघाडीने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करीत पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा आधीच केल्यास त्याचा लाभ मिळेल असा सूर व्यक्त करणाऱ्या गटाने प्रदेश भाजपवर चांगलाच दबाव आणला होता. भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सुशील मोदी, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, नंदकिशोर यादव यांची नावेही चर्चिली जात होती. एकेकाळचे सिनेस्टार शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारचा चेहरा म्हणून समोर आणण्याचा विचार पुढे आला होता. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित न करताच सत्ता मिळविली आहे. याच आधारावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारमध्ये उमेदवार न ठविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.