ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान हे बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले असे मत भाजपा खासदार हुकुमदेव नारायण यांनी मांडले आहे. भागवत यांच्या विधानावर बौद्धिक चर्चा होणे अपेक्षित असले तरी त्या विधानाचे टायमिंग चुकले असेही त्यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू, राजद व काँग्रेस महाआघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला असून या पराभवासाठी संघाची आरक्षणसंदर्भातील भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपा खासदार हुकुमदेव नारायण यांनीदेखील संघाच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचे टायमिंग चुकल्याचे सांगितले. सरसंघचालकांच्या विधानाने जनतेमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे नारायण यांनी नमूद केले.
सरसंघचालक भागवत यांनी आरक्षण व्यवस्थेती परिक्षण करण्याची गरज आहे असे म्हटले होते. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु होताच भाजपा व संघांने यावरुन सारवासारवही केली होती. दरम्यान, सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बैठकीत बिहारविषयीच चर्चा झाली असावी अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.