राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. यामागचं कारण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले की, "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यात रस नाही. मात्र, ज्याला तिथे जायचे असेल तो जाऊ शकतो. पण आम्ही त्यादिवशी तिथे जाणार नाही." याच दरम्यान भाजपाने यावर पलटवार केला आहे.
भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी राहुल गांधींवर प्रत्युत्तर दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोधी पक्ष उपस्थित न राहिल्याबद्दल हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "बोलणं हे विरोधकांचं काम आहे, पण त्यांना हेही माहीत नाही की ते रामाच्या विरोधात बोलण्यासाठी तयार झाले आहेत. भारतीय असल्याच्या नात्याने आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे. यावर राजकारण करू नये. जर ते येत नसतील तर ते त्यांचं नुकसान आहे, आमचं नाही" असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी "आमच्या पक्षातील कोणीही तिथे जाऊ शकतं. मात्र आम्ही राजकीय कार्यक्रमांना जाणार नाही. मला वाटतं की, जो खऱ्या अर्थाने धर्मावर विश्वास ठेवतो त्याचं त्याच्याशी वैयक्तिक नातं असतं. मी माझं जीवन धर्माच्या तत्त्वांनुसार जगण्याचा प्रयत्न करतो. मी लोकांशी योग्य वागतो आणि त्यांचा आदर करतो. मी द्वेष पसरवत नाही" असं म्हटलं आहे.
आरएसएस आणि भाजपाने 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवला आहे. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. सर्व धर्मांना मानणारे आणि त्यांचा आदर करणार्यांपैकी आम्ही आहोत. हिंदू धर्मातील मोठ्या नेत्यांनीही आपलं मत मांडलं आहे. त्यांनी याला राजकीय कार्यक्रम असंही म्हटलं आहे.