West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:58 IST2021-05-30T18:56:15+5:302021-05-30T18:58:33+5:30
TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश.

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"
पश्चिम बंगालमधील (West Bengal) सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) आलेले खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांचे सुपुत्र शुभ्रांशु रॉय यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला आहे. "पक्षानं ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणं बंद करावं," असा सल्ला त्यांनी आपल्याच पक्षाला दिला आहे. दरम्यान, त्यांच्या या सल्ल्यानंतर पराभवानंतर भाजपमध्ये असंतोष पसरला आहे का? असा सवाल आता केला जात आहे.
"लोकांच्या समर्थनानं आलेल्या सरकारवर टीका करण्यापूर्वी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. निवडून आलेल्या सरकारवर टीका करणं बंद करा आणि आत्मपरीक्षण करा," असा सल्ला रॉय यांनी दिला. त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे यावर भाष्य केलं. त्यांची ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. शुभ्रांशु रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बिजपुर येथून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
काही दिवसांपूर्वी 'यास' चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलकात्याला गेले होते. त्यानंतर त्यांनी एक समीक्षा बैठकीचंही आयोजन केलं होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे मुख्य सचिव या बैठकीत अर्धा तास उशीरानं पोहोचले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी २० हजार कोटी रूपयांच्या मागणीची यादी देत काढता पाय घेतला होता. यानंतर भाजपनं ममता बॅनर्जींवर टीका केली होती. तसंच ममता बॅनर्जी यांनीदेखील आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर दिलं होतं.