नवी दिल्ली : १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या शहिदांच्या कुटुंबियांनी संसद भवनात या शहिदांच्या स्मृतीत आयोजित कार्यक्रमावर बहिष्काराचा घेतलेला निर्णय मागे घेतला असून, ते आता या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात शहिदांच्या कुटुंबियांच्या प्रतिनिधी मंडळाने संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी चर्चा केली. अ.भा. दहशतवादविरोधी मोर्चाचे प्रमुख एम.एस. बिट्टा यांनी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला दिल्या जाणाऱ्या देहदंडाच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ शहिदांच्या कुटुंबियांनी वीरता पदके सरकारकडे परत करून श्रद्धांजली कार्यक्रमावरही बहिष्कार घातला असल्याचे सांगितले. अफजलला गेल्या वर्षी ९ फेब्रुवारीला फाशी देण्यात आली होती. शहिदांच्या कुटुंबियांनी परत केलेली पदके पुन्हा परत घेतली; मात्र अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे श्रद्धांजली कार्यक्रमापासून ते दूर राहिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संसद हल्ल्यातील ‘त्या’ कुटुंबियांचा बहिष्कार मागे
By admin | Published: September 27, 2014 6:55 AM