कानपूर
एका मुलीनं कुटुंबीयांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न केलं. अगदी सर्व पारंपारिक विधींसह थाटामाटात लग्न झालं. नवरदेवाच्या घरी जाण्याची वेळ आली आणि सजवलेल्या कारमध्ये बसून वर-वधू निघाले. जवळपास ४०० किमीचं अंतर कापलं. इतकं अंतर कापल्यानंतरही जेव्हा वधूला कळालं की आपलं सासर अजूनही ९०० किमी दूरवर आहे तेव्हा वधूला धक्काच बसला. तिनं आपलं मन बदललं आणि कार थांबवण्यास सांगितली. कानपूरजवळ कार थांबवून ती थेट पोलीस ठाण्यात गेली आणि आपलं लग्न मोडावं अशी पोलिसांनाच विनंती करू लागली. पोलिसांनी वधूच्या कुटुंबीयांना बोलावून तिला त्यांच्यासोबत पाठवलं आणि नवरदेव रिकाम्या हातीच घरी परतला.
वाराणसी येथे राहणाऱ्या वैष्णवी हिचं लग्न बिकानेर येथील रहिवासी असलेल्या रवी याच्यासोबत झालं. रवी वरातीसह गुरुवारी बिकानेरमध्ये परतला. पण त्याच्यासोबत पत्नी नव्हती. रवी आणि वैष्णवी यांचं लग्न वाराणसी कोर्टात झालं होतं. लग्नानंतर वाराणसीहून ४०० किमी अंतर कापल्यानंतर जवळपास ७ तासांचा प्रवास झाला असेल आणि वधूनं झालेलं लग्न मोडलं. पेट्रोल पंपपाशी कार थांबली असता वधूनं माहिती घेतली की आणखी नेमकं किती दूर जायचं आहे. त्यानंतर तिला कळालं की बिकानेरला जायचंय. वैष्णवीला धक्काच बसला. पेट्रोल पंपजवळ पोलिसांना पाहून ती जोरजोरात रडूच लागली. पोलिसांनी चौकशी केली असताना तिनं वर कुटुंबीयांवर आरोप केले. राजस्थानच्या बिकानेरला जावं लागणार आहे हे आपल्याला आधी माहित नव्हतं असं वैष्णवीनं सांगितलं. आपल्याला हे लग्न आताच मोडायचं आहे. मला घरापासून इतक्या दूर जायचं नाही. मला माझ्या आई-बाबांच्या जवळच राहायचं आहे, असा हट्टच वैष्णवी करू लागली.
वधूची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांनी सर्वांना महराजपूर ठाण्यात बोलावलं. पोलीस ठाण्याचे अधिक्षक सतीश राठोड यांनी वराकडे लग्न केल्याचा पुरावा मागितला. रवीनं कोर्ट मॅरेज केल्याचे पुरावे दाखवले. तसंच आपण बिकानेरचे रहिवासी असल्याचं मुलीच्या कुटुंबीयांना माहित होतं असंही सांगितलं. यानंतर पोलिसांनी वधूच्या आईशी चर्चा केली. वधूच्या आईनं सांगितलं की,"माझे पती नाही. आमच्या एका नातेवाईकानं लग्न ठरवलं होतं. आम्हाला तर इतकंच माहित होतं की मुलगा अलाहबादचा आहे. माझ्या मुलीला जर बिकानेरला जायचं नसेल तर तिनं जाऊ नये. तिला तुम्ही घरी पाठवा. आम्ही लग्न मोडतो"
पोलिसांनी यांतर दोन्ही बाजूंना समोरा-समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. पण वधू सासरी जाण्यास अजिबात तयार नव्हती. तर पोलिसांनी महिला पोलिसाच्या सुरक्षेत तिला माहेरी पाठवलं. तर वराला रिकाम्या हातीच बिकानेरला परतावं लागलं.