Waqf Bill Amendment Act: वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीबाबत सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी केले. प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘वक्फ सुधार जनजागर अभियाना’ निमित्त झालेल्या कार्यक्रमात रिजिजू बोलत होते. "वक्फ बाय युजर’ ही तरतूद अत्यंत घातक होती. यामुळे वक्फ संपत्ती ठरविण्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते. हीच परिस्थिती कायम राहिली असती तर संसदेच्या इमारतीवरही हक्क सांगितला गेला असता. त्यातून भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती," असे रोखठोक विधान रिजिजू यांनी व्यक्त केले.
मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर करा...
यावेळी रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकातील प्रमुख बाबींचे विस्ताराने विश्लेषण केले. रिजिजू म्हणाले, "नव्या कायद्यामुळे गोरगरीब मुस्लिमांचे भले होणार आहे. मात्र ज्यांनी वक्फच्या मालमत्तांची वर्षानुवर्षे लूट केली त्यांना वक्फ मंडळांवरील ताबा सोडायची इच्छा नाही. याचसाठी या विधेयकाविरोधात सामान्य मुस्लिमांना भडकावण्याचे प्रयत्न चालू आहेत. विविध माध्यमांचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांनी सामान्य मुस्लिमांच्या मनातील या कायद्याविषयीचे गैरसमज दूर करावेत."
तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती!
"गरीब मुस्लिमांना सध्याच्या वक्फ बोर्डाद्वारे काहीच फायदे होत नव्हते. त्यांना आता न्याय मिळेल. ज्यांनी अवैध पद्धतीने वक्फच्या माध्यमातून जमिनी हडप केल्या त्यांच्याकडून जमिनी काढून गोरगरीब मुस्लिमांना देण्यासाठी हे विधेयक आणले आहे. वक्फ कायद्यात २०१३ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर वक्फच्या ताब्यातील मालमत्ता प्रचंड वेगाने वाढल्या. ‘वक्फ बाय युजर’ ही तरतूद अत्यंत घातक होती. यामुळे वक्फ संपत्ती ठरविण्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते. हीच परिस्थिती कायम राहिली असती तर संसदेच्या इमारतीवरही हक्क सांगितला गेला असता. त्यातून भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती," असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.