नवी दिल्ली : इस्लामाबादेतल्या हार्ट आॅफ एशिया बैठकीत भारतीय पथकाचे नेतृत्व करणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्याचे तपशिलांसह सविस्तर निवेदन संसदेच्या दोन्ही सभागृहात केले. राज्यसभेत गोंधळामुळे स्वराज यांचे निवेदन कोणालाही ऐकता आले नाही, तथापि लोकसभेत अत्यंत शांततेत प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करीत तेच निवेदन स्वराज यांनी सादर केले. भारत पाक दरम्यान बदलत्या संबंधांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या महत्वपूर्ण निवेदनानंतर, १३ पक्षांच्या गटनेत्यांनी स्वराज यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली मात्र दौरा यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही केले. शेवटी सर्वांच्या प्रश्नांना स्वराज यांनी समर्पक उत्तरे दिली.उभय देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या पॅरिस येथील भेटीनंतर चर्चा प्रक्रियेला वेग आला आहे. नियंत्रण रेषेवरील घुसखोरी व दहशतवाद हा सर्वाधिक महत्वाचा विषय असल्याने संदर्भात त्यावर चर्चा व्हावी या हेतूने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नुकतीच बँकाक येथे सकारात्मक वातावरणात बैठक झाली, असे त्या म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)