ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाच्या आठवड्यानंतर त्यांच्या फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरुन वाद निर्माण झाला आहे. कलाम यांच्या नावाने सुरु ठेवलेले सर्व अकाऊंट ताबडतोब बंद करावे असे निर्देश कलाम यांच्या कार्यालयाने कलाम यांचे निकटवर्तीय श्रीजनपाल सिंह यांना दिले आहेत.
एपीजे अब्दुल कलाम यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. कलाम यांच्या निधनानंतर त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे सोशल मिडीया अकाऊंट्स सुरुच ठेऊ अशी घोषणा कलाम यांचे निकटवर्तीय श्रीजनपाल सिंह यांनी केली होती. हे अकाऊंट 'इन द मेमरी ऑफ कलाम' या नावाने चालवले जाणार होते. मात्र दिवंगत राष्ट्रपती कलाम यांच्या कार्यालयाने यावर आक्षेप घेतला आहे.
बुधवारी कलाम यांच्या कार्यालयाने एक पत्रक काढून श्रीजन पाल सिंह यांना कलाम यांच्याविषयी माहिती देण्यासाठी प्रवक्ता म्हणून नियुक्ती केलेली नाही असे स्पष्ट केले. कलाम यांच्या नावाने सुरु ठेवलेले सर्व सोशल मिडीया अकाऊंट्स तातडीने बंद करावेत असे निर्देश श्रीजनपाल यांना दिल्याचे या पत्रकात म्हटले आहे. याविषयी श्रीपालसिंह म्हणाले, कलाम ह्यात असताना त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंट्सची जबाबदारीही माझ्याकडेच होती, कलाम यांच्या कार्यालयाने आदेश दिल्यावर मी हे सर्व अकाऊंट्स बंद केले. पण कलाम यांच्याविषयी माहिती देण्यापासून मला ते रोखू शकणार नाही असे पाल यांनी सांगितले.
कलाम यांच्या निधनानंतर पाल यांनी फेसबुकवर कलाम यांच्यासोबतचे शेवटचे ८ तास ही पोस्ट टाकली होती. ही पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली व हा प्रकार कलाम यांच्या कार्यालय नाराज होते अशी माहिती सूत्रांनी दिली. तर कलाम यांच्या कार्यालयाचे सचिव व कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार वी पोनराज यांच्यामते श्रीजनपाल यांनी कलाम यांच्यासोबतचे अनुभव सांगणे गैर नाही, पण कलाम यांच्या अधिकृत सोशल मिडीया अकाऊंट्सची जबाबदारी स्वीकारण्यासाठी कलाम यांचे कार्यालय सक्षम आहे असे त्यांनी स्पष्ट केले.