यदु जोशी, मुंबईकाँग्रेस हा आयाराम-गयारामांचा पक्ष असल्याची टीका भाजपा आणि इतरही विरोधक सातत्याने करीत आले तरी, आता उमेदवारीत आयारामांचा भरणा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच अधिक असून काँग्रेसच्या यादीमध्ये एकही आयाराम नाही, हे यंदाच्या निवडणुकीचे विशेष!निष्ठावंतांना डावलून आयत्यावेळी आयारामांना संधी द्यायची नाही, असा काँग्रेसने धोरणात्मक निर्णयच घेतला होता. अनायसे राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मोडली. त्यामुळे लढण्यासाठी २८८ मतदारसंघ मोकळे झाले. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली. प्रदीप पवार (पाचोरा), योगेंद्र पाटील (मुक्ताईनगर), लक्ष्मणराव घुमरे (मेहकर), संजय लाखे पाटील (घनसावंगी), दिलीप पाटील (जळगाव ग्रामीण) अशी पक्षसंघटनेत अनेक वर्षे काम करीत असलेली अनेक नावे आता उमेदवार यादीत दिसत आहेत. गेली पाच वर्षे जे काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते त्यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली. पण मौलाना मुफ्ती, शरद गावित अशा इतर पक्षातील आमदारांना आपल्यात आणून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. तर भाजपा, शिवसेनेने एकमेकांची आणि इतर पक्षातील माणसे पळवून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. काँग्रेसने हा मोह आवरला. प्रदेश काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, काँग्रेसमध्ये सातत्याने काम करीत आलेल्यांनाच संधी देण्यामागचा पक्षाचा चांगला हेतू आहे. उद्या यातील कोणी पराभूतही झाले तरी पक्षाचेच काम करत राहतील, पक्षाच्या संपर्कात राहतील. स्थानिक कार्यकर्त्याला तो विधानसभेचा उमेदवार राहिला असल्याचे अभिमानाने सांगता येईल. बाहेरच्याला भाव देऊन उमेदवारी गळ्यात टाकून निष्ठावनांना नाराज करायचे नाही, असे काँग्रेसने ठरविले होते.
उडत्या पाखरांना काँग्रेसने नाकारले
By admin | Published: September 29, 2014 7:21 AM