"भाजप लोकशाहीची हत्या..."; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 01:20 IST2025-02-14T01:16:56+5:302025-02-14T01:20:37+5:30
"हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय...?"

"भाजप लोकशाहीची हत्या..."; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१३ फेब्रुवारी २०२५) मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या निर्णयावरून, देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले, भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, गेल्या २० महिन्यांपासून काँग्रेस ज्याची मागणी करत होती ते अखेर घडले आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
प्रमोद तिवारी म्हणाले, "भाजप लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे! मणिपूर सरकार अल्पमतात, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला! काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. तरीही विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी का दिली गेली नाही? भाजप सरकार स्थापन करू शकत नव्हता. यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करून सत्तेवर कब्जा केला! हे सर्व केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर घडले. ही लोकशाहीची हत्या नाही तर काय आहे?"
'परिस्थिती संभाळण्यास गृह मंत्री अयशस्वी' -
याशिवया, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गेल्या २० महिन्यांपासून ज्याची मागणी करत होती, तेच घडले. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सुप्रिम कोर्टाने राज्यात संवैधानिक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे म्हटल्यानंतर, हे घडले आहे. येथे ३ मे २०२३ पासून आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ६०,००० हून अधिक पुरुष, महिला आणि मुले विस्थापित झाली आहेत. हे तेव्हा घडले, जेव्हा मणिपूरच्या सामाजिकतेवर गंभीर आघात झाला. हे तेव्हा घडले जेव्हा फेब्रुवारी 2022 मध्ये भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे बहुमत मिळाले. मात्र, त्यांच्या राजकारणाने केवळ १५ महिन्यांतच ही भयानक दुर्घटना घडली.
याशिवाय, असे तेव्हा घडले, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मणिपूरची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी ही जबाबदारी त्यांना सोपवली होती. एवढेच नाही, तर हे तेव्हा घढले आहे, जेव्हा जग भरात फिरणारे पंतप्रधान, मणिपूरला जाण्यास आणि तेथे समेटाची प्रक्रिया सुरू करण्यास सतत नकार देत आहेत," असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.