नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असून, देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजारांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा उपाय नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशात आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.'
राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशात अधिकाधिक चाचण्या होणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत राज्य, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना अधिकचे अधिकार दिले पाहिजेत. कोरोनाविरोधातील लढाई ही वरून खाली नव्हे तर तळापासून वरपर्यंत लढली गेली पाहिजे.'
दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाई ही दोनप्रकारे लढली गेली पाहिजे, एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध केली गेली पाहिजेत. लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून आधीच खबरदारी घेतली गेली पाहिजे. तसेच आर्थिक आघाडीवरही महत्वाचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. शेतकरी, कामगार, उद्योगधंदे यांना मदत देण्याबाबत तातडीने निर्णय घेतले पाहिजेत, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच कोरोनाविरोधात देशवासीयांनी एक होऊन लढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.