नवी दिल्ली : गेल्या 100 हून अधिक दिवसांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, काँग्रेसने राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणाबाबत सीआरपीएफचे उत्तर समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र, अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधींनी सुरक्षेच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे.
सीआरपीएफला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, 2020 पासून राहुल गांधी यांनी स्वत: 113 वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. या विषयी त्यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधीच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा देण्यात आलेल्य व्यक्तीला सीआरपीएफने दिलेल्या आदेशनुसार राज्य पोलिस, सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. गृहमंत्रालयाद्वारे तैनात सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि राहुल गांधी बरोबरच कॉंग्रेसला देखील माहिती देण्यात आला आहे.
याचबरोबर, सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून दिल्ली पोलिसांनीही पर्याप्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते. अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधी यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असून त्यांना वेळोवेळी याबाबत माहिती देण्यात आली आहे, असेही सीआरपीएफने म्हटले आहे. दरम्यान, सूत्रांचे म्हणणे आहे की, सीआरपीएफ हा मुद्दा वेगळ्याप्रकारे समोर आणू शकते.