पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पक्षासह दिल्लीतील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि २०१३ पूर्वी दिल्लीत दीर्घकाळ सत्तेवर काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने दिल्लीत विजयी हॅटट्रिक करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहेत. त्यातही दिल्लीत तिरंगी लढत होत असल्याने इंडिया आघाडीत एकत्र असलेले काँग्रेस आमि आम आदमी पक्ष ही एकमेकांच्या आमने सामने आले आहेत. तर दुसरीकडे भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये २ लाखांहून अधिक बैठका घेण्याच्या तयारीत आहे. तर १३ हजारांहून अधिक बुथवर घरोघरी जाऊन मतदारांना भाजपाला मत देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. याआधी हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हीच रणनीती आखली होती.
हरयाणामध्ये काँग्रेसची लाट असल्याचे दावे केले जात होते. तसेच काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात होते. एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात हरयाणाचे निकाल धक्कादायक लागले होते. तसेच हरयाणाध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. ९० जागा असलेल्या हरयाणा विधानसभेमध्ये भाजपाला ४८ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
हरयाणामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ग्राऊंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात काम केलं होतं. तसेच हरयाणात १६ हजारांहून अधिक लहान मोठ्या सभा घेतल्या होत्या. हरयाणा आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडनूक हा पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. अशा परिस्थितीत संघाने सूत्रे हाती घेऊन हिंदूंना जातपात, प्रांत, भाषा, मतभेद विसरून मतदान करण्याचं आवाहान केलं होतं. तसेच त्याचा भाजपाला मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे निकालांमधून दिसून आलं होतं.
दरम्यान, दिल्लीमध्ये मागच्या २६ वर्षांपासून भाजपाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. अशा परिस्थितीत हा वनवास संपुष्टात आणण्याची तयारी संघाने केली आहे. २०१४ नंतर सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत भाजपाला मोठं यश मिळालं होतं. मात्र २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे या पराभवांची पुनरावृत्ती टाळण्याचं मोठं आव्हान यावेळी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर असणार आहे.