AAP-Congress Delhi Election 2025: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडत अरविंद केजरीवालांनी स्वबळाचा नारा दिला. तेव्हापासूनच काँग्रेस बदल्याच्या भावनेने कामाला लागल्याचे दिसले. राहुल गांधींपासून काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी केजरीवालांना लक्ष्य केले. निवडणुकीचे निकाल लागले. काँग्रेसला या निवडणुकीतही अपयश आले, पण नेत्यांच्या निकालाबद्दलच्या प्रतिक्रिया उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे अप्रत्यक्षपणे सांगणाऱ्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'२०१३ मध्ये आम आदमी पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा त्यावेळचा निर्णय हे काँग्रेसच्या पिछेहाटीचं सर्वात मोठं कारण होतं', असे काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणालेले. त्यानंतर काँग्रेसनेच आम आदमी पक्षाला भ्रष्टाचार आणि असुविधांच्या मुद्द्यांवरून घेरलं. इंडिया आघाडीत फूट पडल्याचा मेसेजही यातून स्पष्टपणे गेला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीआधीपासूनच काँग्रेसच्या दिल्लीतील ऱ्हासासाठी नेते आम आदमी पक्षाला जबाबदार ठरवू लागले होते. त्यामुळे प्रचारात भाजप विरुद्ध आप असे चित्र होतेच, त्याचबरोबर आप विरुद्ध काँग्रेस असा संघर्षही दिसला होता.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसला दिल्लीत आपचे सरकार नको होते, अशी भूमिका आता काँग्रेसकडून मांडली जाताना दिसत आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सत्तांतर होणं अपेक्षित होतं, अशीच भूमिका मांडली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल काँग्रेसचे नेते काय बोलले?
काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना म्हणाल्या की, "दिल्लीतील लोकांना बदल हवा होता. त्यांनी बदलासाठी मतदान केलं. लोकांसोबतच्या बैठकीतून हे दिसत होतं", असे म्हणत त्यांनी आपचा पराभव अपेक्षित होत असेच प्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
इतकंच नाही, तर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही अशाच आशयाची भूमिका मांडली. "आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबादारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत. आम्ही राजकीय पक्ष आहोत."
अलका लांबा म्हणाल्या की, "ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले आहे, दिल्ली त्यांचे नुकसान केले आहे."
काँग्रेस-आप वैर वाढणार?
आप आदमी पक्षाची दिल्लीतील सरकार गेलं. त्यानंतर काँग्रेस आणि आपमधील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमुळे आपला फटका बसला, तर त्याचा फायदा थेट भाजपला झाल्याचे आकेडवारीतून दिसत आहे.
हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल काँग्रेसविरोधात जाहीरपणे बोलू लागले होते. आता केजरीवालांनाच सत्तेतून पायउतार व्हावं लागल्याने दोन्ही पक्षातील वैर वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.