कुशीनगर : दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आता निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची की काय? असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.काश्मीरमधील शोपियान येथे रविवारी सकाळी लष्कराशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे जाहीर सभेत ते म्हणाले की, देशाच्या काही भागांत लोकसभा निवडणुकांसाठी सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांना आमच्या सरकारने मारले म्हणून काही लोक चिंताग्रस्त आहेत. जेव्हा सशस्त्र दहशतवादी हल्ला करतात तेव्हा त्यांना मारण्याकरिता परवानगीसाठी लष्करी जवानांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जायला हवे की काय? याप्रकरणी विरोधी पक्षांनी फुकाचा कांगावा सुरू केला आहे.ते म्हणाले की, काश्मीरमध्ये भाजपचे आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून दररोज आम्ही दहशतवाद्यांवर अधिक कठोर कारवाईला सुरूवात केली. अशी पावले उचलणे हे माझे कामच आहे. निवडणुकांसाठी मतदान सुरूअसताना सुरक्षा जवान दहशतवाद्यांवर गोळीबार करतात अशी धक्कादायक विधाने विरोधी पक्ष कसे काय करू शकतात असा सवालही त्यांनी विचारला.
अतिरेकी मारण्यासाठी आयोगाला विचारायचे का? - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:33 IST