Dhirendra Shastri Ranveer Allahbadia Samay Raina: युट्यूबवरील इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या व्हिडीओवर संताप व्यक्त करत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांनी जे केले आहे, ते खूपच निंदाजनक आहे. इतकं घाणेरडं आहे की, बोलणंही अवघड आहे. अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे. त्यांना माफ करायला नको, तर मनातून आणि ह्रदयातून काढून टाकलं पाहिजे', अशा शब्दात त्यांनी सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'देशाच्या सनातन संस्कृतीशी जे खेळ करत आहेत, निश्चितपणे असे लोक निर्दयी आहेत. सरकार अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करत आहेत. आम्ही लोकांना आवाहन करतो की, वेट अॅण्ड वॉच. व्यक्ती कसा आहे, हे आधी जाणून घ्या. त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. या दोघांनी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. ज्या ऐकणंही कठीण आहे. अशा लोकांना माफ करू नका, तर मनातून काढून टाका', असे आवाहन धीरेंद्र शास्त्रींनी लोकांना केले.
समय रैनाचे दोन शो रद्द
रणवीर अलाहाबादियाच्या शोमुळे समय रैनाही वादात सापडला आहे. त्याचे दोन शो गुजरातमध्ये होणार होते. ते रद्द करण्यात आले आहेत.
समय रैनाचा अहमदाबाद आणि सूरतमध्ये कार्यक्रम होणार होता. वाद निर्माण झाल्यामुळे दोन्ही शो रद्द करण्यात आले आहेत. १७ मार्च आणि २७ एप्रिल रोजी हे शो होणार होते.
बीयर बायसेप्स नावाने प्रसिद्ध असलेल्या रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. रणवीरने माफी मागितली असली, तरी त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या विधानाचे पडसाद संसदेतही उमटले आहेत.