केंद्र सरकारने सुरु केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत होणाऱ्या अग्निवीर भरती प्रक्रियेला मोठा विरोध करण्यात आला होता. काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सैन्य दलाचे कंत्राटीकरण होत असल्याच आरोप करत या भरतीप्रक्रियेला विरोध केला. मात्र, त्यानंतरही अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली असून आता उमेदवारांचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यात, ४ वर्षांच्या सेवाकालावधीनंतरही उमेदवारांना पुढे सैन्यात नोकरी करता येणार आहे. एक चतुर्थांश उमेदवारांना रिटेन केले जाणार आहे.
अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे. चार वर्षानंतर या चाचणीतील रेटींगचा परफॉर्मन्स पाहिला जाईल. त्यामध्ये, जे अग्निवीर पात्र ठरतील, ज्यांचा परफॉर्मन्स बेस्ट राहिल, त्यांना पुढील १५ वर्षे सैन्य दलात सेवा करण्याची संधी देण्यात येणार आहे. इतर अग्निवीरांना सैन्यातून रिलीज केले जाईल. या ४ वर्षांच्या कार्यकाळात ज्या अग्निवीरांच्या छातीवर वीरता मेडल लागले जातील, त्यांनाच पुढील सेवेसाठी प्राधान्य दिले जाईल, असे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
रेटींग प्रणातील सर्वाधिक महत्त्व हे ऑपरेशनल अॅप्टीट्युडला दिले जाईल. दरवर्षी चेन ऑफ कमांडद्वारे याचे आकलन केला जाईल. याचे योगदान ३९ टक्के असणार आहे.
अशी राहिल गुणवत्ता चाचणी
फिजिकल फिटनेस, फायरींग आणि ड्रीलचे क्वांटिफाईड टेस्ट दोन वर्षात एकदा घेतली जाईल. याचे योगदान ३६ टक्के असेल.
पहिल्या आणि चौथ्या वर्षी अग्निवीरांना वेगवेगळ्या चाचणींतून निवडण्यासाठी एक स्वतंत्र स्क्रिनिंग बोर्ड असणार आहे. ज्याचे योगदान २५ टक्के असेल.
गॅलंट्री अवॉर्ड जिंकणाऱ्या अग्निवीरांना अधिकचे म्हणजेच एक्स्ट्रा मार्क दिले जाणार आहेत. शिस्तपालन न केल्यास किंवा बेशिस्तपणा दाखवल्यास निगेटीव्ह मार्कही दिले जाणार आहे.