भोपाळ : भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून फरार सिमीच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दहशतवादी कारागृहातून पळाले तेव्हा त्यांनी कैद्यांचे कपडे घातले होते. पण चकमकीत मारल्या गेले तेव्हा त्यांनी जीन्स, टी-शर्ट आणि घड्याळी घातलेल्या होत्या. त्यांच्याकडे कपडे कुठून आले आणि कुणी पाठविले तसेच कारागृहातून फरार होण्यासाठी त्यांना कुणी मदत केली? यासह अनेक प्रश्न दिवसभर जनमानसात निर्माण होत होते. मध्यवर्ती कारागृहातून पळालेल्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत मारल्याचा दावा करणारे पोलीस अधिकारी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मानसिकतेत नाही. दहशतवादी कारागृहातून फरार झाले तेव्हा त्यांच्या अंगावर कैद्यांचे कपडे होते. पण चकमकीत मारल्या गेले तेव्हा त्यांच्या अंगावर जीन्स, टी-शर्ट आणि महागड्या घड्याळी होत्या. अखेर हे सर्व त्यांच्याकडे कुठून आले, हे अनभिज्ञ आहे. सर्व दहशतवादी फरार झाल्यानंतर त्यांना ९ ते १० तासात मारल्याचा पोलिसांचा दावा आहे. पण दहशतवाद्यांना कारागृहातून फरार होण्यास कुणी मदत केली, यावर पोलिसांनी चुप्पी साधली आहे. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काहीही सांगितले नाही. पण मध्य प्रदेश कारागृह विभागाचे प्रमुख सचिव विनोद शेमवाल यांनी या घटनेत कारागृह विभागाचा कुणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना फरार होण्यास मदत केल्याचे मान्य केले आहे. >साक्षीदार म्हणाला, मी फोन केल्यानंतरच पोहोचले पोलीसदहशतवादी कारागृहातून पळाले तेव्हा पोलिसांनी अलर्ट जारी करून भोपाळच्या आसपासच्या सर्व ठाण्यांना सूचना दिली होती. या सूचनेनंतरच अचारपूर गावाचे सरपंच सुरेश मीणा यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी काही दहशतवादी कारागृहातून फरार झाल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी दहशतवाद्यांना डोंगरावर बघितले. त्याची माहिती सरपंचाने पोलिसांना दिली. पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वीच गावकऱ्यांनी दहशतवाद्यांची घेराबंदी केली होती. याची माहिती दहशतवाद्यांना नव्हती. दहशतवाद्यांना मोठ्या संख्येने गावकरी दिसले तेव्हा त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. सरपंचाने पोलिसांना सांगितले की, दहशतवाद्यांनी गावकऱ्यांवर दगडांचा मारा केला आणि धमकीसुद्धा दिली. पण गावकरी घाबरले नाहीत. पोलीस पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि गोळीबार केला. दहशतवाद्यांकडून शस्त्र जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. पण त्यांच्याकडे शस्त्र कुठून आलेत, हे पोलिसांना सांगता आले नाही. >खंडवा कारागृह पलायनाची पुनरावृत्ती...खंडवा कारागृहातून १ आॅक्टोबर २०१३ रोजी पळून गेलेल्या सिमीच्या सातपैकी केवळ चार दहशतवाद्यांना तीन वर्षांनंतर अटक करण्यात यश मिळाले होते. दडून असतानाच्या काळात हे अतिरेकी बँक लुटण्यासह अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी होते. त्यावेळी अतिरेक्यांनी खंडवा कारागृहाची १४ फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले होते. त्यापैकी एका अतिरेक्याने दुसऱ्याच दिवशी शरणागती पत्करली तर एकाला डिसेंबर १३ मध्ये मध्य प्रदेशच्या बारवानी येथे पकडण्यात आले होते. ५ एप्रिल २०१५ रोजी एक अतिरेकी तेलंगणा पोलिसांसोबत चकमकीत मारला गेला. चौथा अतिरेकी फेबु्रवारी २०१६ मध्ये म्हणजे तीन वर्षांनंतर ओडिशातील राऊरकेला येथे पकडला गेला होता.खंडवा कारागृहातून पळून गेलेल्या सिमीच्या अतिरेक्यांनी दडून बसल्यानंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी कारवाया चालविल्या होत्या. सिमीवर २००१ मध्ये बंदी घालण्यात आली होती.
महागडे कपडे आणि घड्याळ्यांनी निर्माण झाले प्रश्न
By admin | Published: November 01, 2016 2:47 AM