इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्ता धुळीत हरवला असल्याने नागरिकांच्या आरोेग्यास धोका निर्माण झाला आहे. धुळीमुळे घसा व नाकाचे विकार वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. इंदिरानगरमधील गजानन महाराज रस्ता सर्वात जुना आणि मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. परिसरात वाढती नागरिक वसाहतीच्या मानाने रस्ता वाहतुकीस अरुंद पडत होता. गेल्या वीस वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाच्या आणि डांबरीकरण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर रस्त्याच्या रुंदीकरणास सहा महिन्यांपूर्वी मुहूर्त लागला. यात काही मिळकतधारकांच्या जागा रस्ता रुंदीकरणाआड येत होत्या; परंतु जागा ताब्यात घेऊन संबंधित मिळकतधारकांना एफएसआय देण्यात आला आणि रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला.दहा दिवसांपूर्वीच रस्त्याचे रुंदीकरण करून खडीकरण करण्यात आले; परंतु अद्यापपर्यंत डांबरीकरण करण्यात न आल्याने दिवसभर होणार्या वाहनाच्या वर्दळीमुळे बारीक खडी आणि धूळ उडत आहे. यामुळे रस्त्यालगत असलेल्या सोसायटी आणि कॉलनीधारकांना घराची दारे, खिडक्या उघडणे मुश्कील झाले आहे. तसेच उडणार्या खडी व धुळीमुळे डोळ्यात धूळ व कचरा जाणे, तसेच घशाचे विकारही वाढले आहेत. तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.वाहनधारक आणि पादचार्यांना रस्त्याने मार्गक्रमण करताना धुळीमुळे अक्षरश: नाक दाबून ये-जा करावी लागत आहे, तसेच दुचाकी वाहने घसरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
गजानन महाराज रस्ता हरवला धुळीत
By admin | Published: January 05, 2015 11:10 PM