ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. १२ - सरकारी नोकरी मिळाल्यानंतर माणूस आत्मसंतुष्ट होतो. आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता मिळाल्याची त्याची भावना असते. 'त्याच्याकडे'ही सरकारी नोकरी होती. पण त्यात तो समाधानी नव्हता. त्याची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची होती. त्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. एकदा त्याने दिल्लीत भरलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि ही भेट त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेली. ही गोष्ट आहे राजस्थानच्या हरीश धनदेवची.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हरीशने त्याच्या १२० एकर शेतजमिनीत कोरफड आणि अन्य पिकांची शेती सुरु केली. आता शेतीमधून हरीशला वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई होते. जैसलमेरपासून ४५ कि.मी. अंतरावर दहीसर येथे हरीशने स्वत:ची कंपनी सुरु केली आहे. थारच्या जमिनीत मोठया प्रमाणात लागवड केली जाणारी कोरफड पतांजली फुड प्रोडक्टसला पाठवली जाते. पंतांजलीमध्ये त्यापासून कोरफडीचा ज्यूस बनवला जातो.
थारच्या वाळवंटात पिकवल्या जाणा-या कोरफडीचा दर्जा उत्तम असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोरफडीला मोठी मागणी आहे. धनदेवने जो धोका पत्करला आज त्याचा त्याला फायदा होत आहे. तो जैसलमेर महापालिकेत ज्यूनियर इंजिनीयरपदावर नोकरीला होता. धनदेवकडे जमीन आणि पाणी होते पण काय करावे हे त्याला माहित नव्हते.
मागच्यावर्षी त्याने कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्याला कोरफड, आमला आणि गुंडाची शेती करण्याची कल्पना मिळाली. वाळवंटात बाजरी, गहू, मूंग ही पिके घेतली जातात. ब्राझील, हॉंगकॉंग आणि अमेरिकेत कोरफडीला मोठी मागणी आहे. सुरुवातीला हरीशने ८० हजार रोपटी लावली होती. आता त्याने ही संख्या वाढवून सात लाख केली आहे.