कामारेड्डी - तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात बिकानूर येथे लग्नाच्या आनंदाच्या वातावरणात विरजन पडलं आहे. याठिकाणी मुलीच्या लग्नाचे विधी पार पाडताना वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने लग्न मंडपात शोककळा पसरली. काही क्षणापूर्वी सगळीकडे आनंद, उत्साह आणि हसणारे चेहरे दिसत होते तिथे एकच सन्नाटा पसरला.
माहितीनुसार, बिकानूर येथील रामेश्वरपल्ली गावातील रहिवासी बालचंद्रम यांच्या मुलीचं लग्न बीटीएस चौकातील एका मॅरेज हॉलमध्ये सुरू होते. लग्नाचे विधी सुरू होते. सगळे आनंदात होते. त्याचवेळी कन्यादानाचा विधी सुरू असताना वडिलांनी मुलीचे पाय धुतले आणि काही क्षणात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत वडिलांचं दुर्दैवाने निधन झाले. लग्न समारंभातील नातेवाईकांनी तातडीने बालचंद्रम यांना कामारेड्डी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्याआधीच त्यांचा जीव गेला होता. हॉस्पिटलला पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वधुच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी लग्न मंडपात पसरली तेव्हा उत्साहाने सजलेल्या मंडपात भयाण शांतता पसरली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या श्योपूर येथेही काळीज पिळवटणारी घटना घडली होती. याठिकाणी एका लग्नात घोड्यावरून मंडपाकडे निघालेल्या नवऱ्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाच्या समारंभात दु:खाचं सावट पसरलं. ही घटना शहरात चर्चेचा विषय बनली. नवऱ्याचा मृत्यू सायलेन्स अटॅकने झाल्याचं सांगण्यात आले.
शुक्रवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील जाट हॉस्टेलवर हे लग्न होते. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वऱ्हाडी मंडळी नाचत गाजत लग्न मंडपाकडे निघाले होते. नवरा प्रदीप जाट उत्साहात घोड्यावर बसला होता. बँन्डबाजा सुरू होता तेव्हा अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. सुरुवातीला कुणालाही काही समजले नाही परंतु जेव्हा नवऱ्याचा तोल गेला तेव्हा गोंधळ उडाला.