ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - भाजपाच्या बिहारमधल्या पराभवावर टिप्पणी करणा-या लालकृष्ण आडवाणी आदी ज्येष्ठ नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचना आपण कधीही केली नव्हती असा खुलासा नितिन गडकरी यांनी केला आहे. बिहारच्या पराभवासंदर्भात लालकृष्ण आडवाणी, यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी व शांताकुमार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना अमित शाहना गडकरींनी केल्याचे वृत्त होते, परंतु मी अशी कोणतीही सूचना केली नसल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे.
या प्रश्नावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चर्चा करत आहेत असे गडकरी म्हणाले.
आडवाणी, जोशी आदी नेते हे आमच्यासाठी अत्यंत आदरणीय आहेत. त्यांचा अपमान होईल असं कोणतंही वक्तव्य आम्ही करू शकत नाही असंही त्यांनी सांगितले.
त्यामुळे माझ्या नावाने प्रसारमाध्यमात झालेली चर्चा अत्यंत चुकीची व दिशाभूल करणारी होती असे ते म्हणाले. आडवाणी व जोशी यांच्याकडे प्रचंड अनुभव असून त्यांचा सल्ला घेतला जाईल असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही स्पष्ट केले आहे.