वक्फ विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळलेला असताना, देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रुपांतर झाल्यावर वक्तव्य आले आहे. मोदी यांनी आज हरियाणाच्या हिसार ते अयोध्या विमानसेवेचे उद्घाटन केले. यावेळी विमानतळावरच मोदी यांनी सभा घेतली.
देश स्वतंत्र झाल्यापासून २०१३ पर्यंत वक्फ बिल चालत होता. निवडणुकीत मते मिळावीत म्हणून २०१३ मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. कायदा असा बनविला की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पुरती वाट लावली. याचा योग्य वापर केला असता तर आज मुस्लिमांना सायकलच्या टायरच पंक्चर काढायची गरज राहिली नसती, असे मोदी म्हणाले.
ते त्यांनी मुस्लिमांच्या हितासाठी केल्याचे काँग्रेस सांगत आहे. जर एवढीच काँग्रेसला खऱ्या मुस्लिमांबाबत आत्मियता आहे तर त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष बनवावे. पण यांचे नेते ते करणार नाहीत. या लोकांना फक्त देशाच्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसने आपल्या पवित्र संविधानाला सत्ता मिळवण्यासाठी एक शस्त्र बनवले आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर सत्तेचे संकट आले तेव्हा त्यांनी संविधान चिरडले आहे. संविधानाचा आत्मा असा आहे की प्रत्येकासाठी समान नागरी संहिता असावी, ज्याला मी समान नागरी संहिता (UCC) म्हणतो, परंतु काँग्रेसने ते लागू केले नाही. उत्तराखंडमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, UCC मोठ्या आनंदाने लागू करण्यात आला. संविधान खिशात घेऊन बसलेले काँग्रेसचे लोक त्याचा विरोध करत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला.
काँग्रेस बाबासाहेबांसोबत कशी वागली हे आपण विसरता कामा नये. काँग्रेसने त्यांना दोनदा निवडणुकीत पराभूत करून अपमानित केले. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एससी, एसटी, ओबीसींचे पेन्शनमधील अधिकार हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली.