2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:28 IST2024-12-13T21:26:35+5:302024-12-13T21:28:11+5:30
2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. मात्र आता 2025 हे वर्ष बाजपला आव्हानात्मक जाऊ शकते...

2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!
भारतीय जनात पक्षासाठी अर्थात भाजपसाठी वर्ष 2024 अत्यंत फलदायी ठरले. भाजपने याच वर्षात केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यावेळी त्यांना स्वबळावर बहूमताचा आकडा गाठता आला नसला तरी, एनडीएतील मित्रपक्षांच्या सहकार्याने त्यांनी बहुमत मिळाले. याशिवाय ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. मात्र आता 2025 हे वर्ष भाजपला आव्हानात्मक जाऊ शकते.
वर्ष 2024 मध्ये या 5 राज्यांत भाजपचा डंका -
या वर्षात भाजपच्या नेतृत्वाखाली NDA ने केंद्रास सरकार स्थापन केले. याच वर्षात, अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले. आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार आले. ओडिशा आणि हिरियाणामध्ये भाजपला मोठा विजय मिळाला. तर, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. येथेही देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री झाला. याशिवाय सिक्किममध्ये एसकेएम, जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस आणि झारखंडमध्ये जेएमएम-काँग्रेस यांचा विजय झाला.
2025 मध्ये या दोन राज्यांत निवडणुका, कशा असतील...? -
वर्ष 2025 मध्ये दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीमध्ये 2020 मध्ये विजयाची हॅट्रिक करत आपने भाजपला धक्का दिला होता. तर बिहारमध्ये जदयू-भाजप आघाडीने विजय मिळवला होता. मात्र यानंतर नितीश यांनी भाजपची साथ सोडली होती. भाजप विरोधी पक्षात आला होता. यानंतर नितीश पुन्हा भाजप सोबत आले. मात्र ते केव्हा काय निर्णय घेतील हे सांगणे अवघड आहे.
दिल्ली संदर्भात बोलायचे जाल्यास, दिल्लीमध्ये केजरीवाल पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने सत्तेत येण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, आपने दिल्लीमध्ये जबरदस्त पाय रोवलेले आहेत. आप तळागाळापर्यंत पोहोचली आहे. यामुळे येथे भाजपसाठी सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा वाटत नाही. याशिवाय, बिहारमध्ये भाजप आणि जदयू नेते विधानसभा निवडणूक सोबत लढण्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे आरजेडीनेही काँग्रेससोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तिसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी शड्डू ठोकला आहे. यामुळे येथे तिरंगी लढत बघायला मिळू शकते.