'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:22 IST2025-04-20T20:21:46+5:302025-04-20T20:22:11+5:30
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेतून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
INDIA Alliance : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लोकसेनंतर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही इंडिया आघाडीत योग्य ताळमेळ पाहायला मिळाला नाही. अशातच, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी निवडमुकांबाबत सूचक विधान केले आहे.
काय म्हणाले अखिलेश यादव?
पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले की, 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कायम राहील. आम्ही एकत्रितपणे भाजपला सत्तेवरुन हाकलून लावण्यासाठी काम करू. त्यांच्या या विधानावरुन काँग्रेस आणि सपामधील आघाडी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
वक्फ कायद्यावरून केंद्रावर हल्लाबोल
वक्फ कायद्यावरून अखिलेश यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, भाजपने वक्फ कायदा आणून जमीन हडपण्याची तयारी केली आहे. भाजपला जिथे जिथे जमीन दिसते, तिथे तिथे ते कब्जा करते. हा पक्ष 'भूमाफिया' बनला आहे. टाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) द्वारे मोदी सरकारने लोकांचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.
महाकुंभावर काय म्हणाले?
अखिलेश यादव यांनी योगी सरकारने प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभ 2025 वरही टीका केली. ते म्हणाले की, सरकारने योग्यरित्या व्यवस्थापन केले नाही, ज्याची चौकशी झाली पाहिजे. योगी सरकारने महाकुंभातील मृतांच्या संख्येबाबत खोटे बोलल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. तसेच, महाकुंभाला आलेल्या भाविकांचे आकडेही चुकीचे सादर करण्यात आल्याचा दावा केला.