Samudrayaan And Gaganyaan Launch Update: गेल्या काही वर्षांपासून भारताने अंतराळ तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. याची प्रचिती चांद्रयान, सूर्ययान, गगयान अशा मिशनमधून येते. दरम्यान, आता भारताने अंतराळासोबतच समुद्राच्या तळाशी यान पाठवण्याची तयारी केली आहे. भारताची अंतराळ मोहिम आणि सागरी मोहीम सोबतच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, 'भारताने खोल समुद्रात मानवाला पाठवण्याची योजना आखली आहे. ही मोहीम 2026 च्या सुरुवातीस मानवी अंतराळ मोहिमेसोबतच होण्याची शक्यता आहे. एक मानव अंतराळात अन् दुसरा खोल समुद्रात, हा एक विलक्षण योगायोग असेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात डीप सी मिशनचा उल्लेख केला होता, याची आठवणदेखील त्यांनी यावेळी करुन दिली. ते म्हणाले की, 'मानवयुक्त अंतराळ मोहीम 2025 मध्ये नियोजित होती, पण काही कारणास्तवर ही 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भारताच्या 7,500 किमी लांबीच्या किनारपट्टीचा आणि त्याच्या विपुल सागरी संसाधनांचा शाश्वत शोध आणि संवर्धनासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.