पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय वायुदलाची १२ मिराज विमानं आज पहाटे बालाकोटमध्ये जाऊन १००० किलोचे बॉम्ब टाकून, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करून शान से परतली. सर्जिकल स्ट्राइकनंतर एअर स्ट्राइक करून त्यांनी पाकिस्तानला जबरदस्त हिसका दिलाय. या कारवाईत २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं समजतं. या कामगिरीबद्दल भारतीय लष्कराचं कौतुक होत असताना, पाकिस्तानी सैन्यानं एक फुसका बार फोडला आहे. आमच्या F16 विमानांनी भारतीय विमानांना परतवून लावल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल असिफ गफूर यांनी केला आहे. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. भारतीय वायुसेनेची ताकद आणि आक्रमक पवित्रा पाहून F16 या विमानांनीच धूम ठोकल्याची माहिती मिळतेय.
१४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं 'जैश-ए-मोहम्मद'नं सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला आज भारतीय हवाई दलाने घेतला आहे. 'मिराज 2000' या हायटेक लढाऊ विमानांमधून भारतानं १००० किलोचे बॉम्ब 'जैश'च्या तळांवर टाकले. पाकिस्तानला गाफिल राहावा, या हेतूने वेगवेगळ्या एअरबेसवरून १२ मिराज विमानांनी टेक ऑफ केलं आणि २१ मिनिटांत आपले वीर मोहीम फत्ते करून परतलेसुद्धा. भारताने आमच्या हद्दीत घुसून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, असा दावा पाकिस्तान आता करतंय. तसंच, आमच्या विमानांनीच भारतीय विमानांना परतवून लावल्याची शेखीही ते मिरवताहेत. परंतु, भारताने जे लक्ष्य निश्चित केलं होतं, ते त्यांनी अचूक साधलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या दाव्यांना फारसा अर्थ नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेनं लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केलेल्या ट्विटमध्ये, पाकिस्तानची विमानं मागे फिरल्याचं नमूद केलं आहे. तसंच, भारताने नियमभंग न करता ही कारवाई केल्याचंही अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पाकिस्तानचे हे दावे, आरोप म्हणजे, स्वतःची अब्रू वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्नच मानला जातोय.
दरम्यान, भारतीय लष्करावर - वायुसेनेवर देशभरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. 'ये नया हिंदुस्थान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी', अशी दाद नेटिझन्स देत आहेत. तर, 'हाऊ इज द जैश... डेड सर', अशी दहशतवाद्यांची खिल्लीही उडवली जातेय.