जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली. अमित शाह यांनी मृतांच्या नातेवाईकांची श्रीनगरमध्ये भेट घेऊन सांत्वन केलं. याच दरम्यान डोळे पाणवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हरियाणाच्या विनय नरवाल याचाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे. यानंतर पत्नीने आता विनयला अखेरचा निरोप दिला आहे.
विनय नरवालच्या पत्नीने शवपेटीला मिठी मारली. खूप रडली. शेवटी सॅल्यूट करून तिने जयहिंद असं म्हटलं आहे. हरियाणा सीएम नायब सिंह सैनी यांनी व्हिडीओ कॉलवर विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वन केलं आहे. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विनयच्या आजोबांनी पत्रकारांना सांगितलं की, "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण त्याला व्हिसा मिळाला नाही आणि म्हणूनच तो काश्मीरला गेला."
"लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
आजोबांनी पंतप्रधान मोदींना दहशतवाद संपवण्याचं आवाहन केलं. मूळचा हरियाणाच्या कर्नल जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नेव्हीमध्ये रुजू झाला होता. विनयला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. विनयची पत्नी सुरक्षित आहे. या घटनेनंतर विनयच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.