ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १३ - भारताने ५० षटकांत ४०४ धावा करत लंकेच्या गोलंदाजांची नाचक्की केली आहे. सलामी वीर अजिंक्य रहाणेने सहा चौकार लगावत २४ चेंडूत २८ धावा झाल्या असताना अँजेलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाल्याने क्रिकेट रसिकांची निराशा झाली होती. मात्र रोहित शर्माने एक दिवसीय सामन्यात एक नवा इतिहास रचला आहे. आज ( गुरुवारी) झालेल्या सामन्यात रोहित शर्माने विरेंद्र सेहवागचा २१९ धावांचा विक्रम मोडून काढत १७३ चेंडूत २६४ धावा करत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. रोहित शर्माने तब्बल ३३ चौकार व ९ षटकार लगावत लंकेच्या गोलंदाजांना धुळचारली. लंकेचा गोलंदाज नुआन कुलसेकराने ८९ धावा दिल्या परंतू, रोहित शर्मा कुलसेकराच्याच गोलंदाजीवर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारायचा प्रयत्न केला असताना महेला जयवर्धनेकडे झेल गेला. रोहित शर्मा व विराट कोहली वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला उल्लेखनीय फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने ६६ धावा, सुरेश रैना ११ धावा उथप्पा १६ धावा करत नाबाद राहिला आहे. लंकेपुढे ४०४ धावांचे आव्हान असून भारतीय गोलंदाज त्यांना रोखण्यात कितपत यशस्वी होतील हे पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे.