ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - त्रिलोकपूरी येथे झालेल्या प्रचारसभेत आप नेते अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर होणा-या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपसह इतर सर्व पक्षांच्या निधीची चौकशी व्हावी असे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आपच्या कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
आप पक्षाचे देणगीदार असलेल्या कंपन्या खोट्या असल्याचे एका संस्थेने सांगितले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी कंपन्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर भेट दिली असता तिथे कार्यालय नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आप नेते केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. परंतू, संध्याकाळी त्रिलोकपूरी येथे झालेल्या सभेत केजरीवाल यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर दिले. सरकार भाजपाचे आहे, आम्ही दोषी असल्यास त्यांनी आम्हाला अटक करावी, आम्ही दोषी आहोत मग आम्हाला अटक का करण्यात येत नाही असा प्रश्न केजरीवाल यांनी प्रचारसभेतून भाजपाला विचारला आहे.
खोट्या कंपन्यांबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही देणगीदारांचे पत्ते तपासायला जात नाही, सरकारने तसे कोणतेही नियम केलेले नाहीत ते केले असते तर पत्ते देखील तपासले असते असे केजरीवाल यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देत त्यांनी असे सांगितले की, देणगीदार कंपन्यांचे बँक अकाऊंट, आयकर खात्याकडे असलेली नोंद आणि कंपनी नोंदणीकृत असल्याचे तीन निकष आम्ही तपासले होते. असे सांगत केजरीवाल यांनी त्यांच्यावर होणारे आरोप परतवून लावले. मी राजीनामा दिल्यावर एक वर्ष राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी निवडणुका का घेतल्यानाही असा सवालही केजरीवाल यांनी विचारला, त्याचप्रमाणे आपण जनतेला नविचारता राजीनामा देऊन चुक केल्याचे केजरीवाल यांनी मान्य केले.