ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ५ - जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर नारसू येथे दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तुकडीवर हल्ला केला असून या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून यात आत्तापर्यंत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे.
उधमपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर नारसू येथून बीएसएफची एक तुकडी जात होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी तुकडीवर अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान घटनास्थळीच शहीद झाले तर ९ जण जखमी झाले. सध्या घटनास्थळी बीएसएफचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक थांबवली आहे.
दरम्यान, एकीकडे दहशतवाद्यांचा हल्ला ताजा असतानाच दुसरीकडे सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात सीमारेषेजवळील गावात राहणारी एक महिला जखमी झाली आहे.