माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

By Shrimant Mane | Published: January 15, 2023 09:25 AM2023-01-15T09:25:57+5:302023-01-15T09:26:54+5:30

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक

Joshimath Issue The monstrous hunger of men, the crumbling foundation of God's land | माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

माणसांची राक्षसी भूक, देवभूमीचा खचला पाया

Next

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, नागपूर: देवभूमीचा पाया खचला आहे. हिरण्यकश्यपू खांबातून निघाला होता, तसा जिथे आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली, त्या पवित्र जोशीमठाच्या भूगर्भातून नवा राक्षस धरतीचे कवच फोडून बाहेर येऊ पाहतो आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली हिमालयाची चाळण केल्याने भूगर्भात प्रचंड आक्रंदन सुरू आहे आणि त्याची परिणती काय होईल, या भीतिदायक कल्पनेने पंचवीस हजार लोकसंख्येच्या छोट्याशा, पर्वताच्या उतारावर वसलेल्या जोशीमठाची, उत्तराखंडची, हिमालयीन पर्वतराजीची झोप उडाली आहे. 

जोशीमठातील खचलेल्या घरांवर लाल फुल्या मारणे, लोकांना इतरत्र हलविणे, धोकादायक हॉटेल्स व इमारती पाडणे सुरू आहे. बहुतेक ते गाव हलवावेच लागेल आणि या आपत्तीचे मुख्य कारण तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पात धरणाचे पाणी टर्बाईनपर्यंत नेणारा १२ किमी लांबीचा बोगदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ किमीचा बोगदा खोदून झालाय. उरलेले चार किमी खोदताना टनेल बोअरिंग मशिन अडकली. ती बाहेर काढण्यासाठी ब्लास्ट केले. त्याने भूगर्भातील जलप्रवाह फुटले. पाणी वाहू लागले. त्या भुसभुशीत पोकळीत मलबा शिरला व वरची जमीन ढासळू लागली, असा काहीसा हा घटनाक्रम आहे. 

केवळ जोशीमठ किंवा चमोली जिल्हाच नव्हे, तर आयताकृती उत्तराखंड राज्यातील मधला आडवा टापू अस्वस्थ आहे. अतिउत्तरेकडील गंगोत्री व नंदादेवी हिमशिखरांच्या दोन प्रमुख समूहापैकी पूर्वेकडील, नेपाळ सीमेला लागून असलेले नंदादेवी ग्लेशियर्स नैसर्गिक आपत्तीप्रवण आहे. भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, हिमवादळे, ढगफुटी, महापूर अशा संकटांची मालिका हा भाग भोगतो आहे. जोशीमठासोबत केदारनाथ, बागेश्वर, चमोली, पिठोरगड, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी या भागांतील अनेक गावांमध्ये भूस्खलन होतेय. पक्क्या डांबरी, सिमेंटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. बहुतेक ठिकाणी घराखालून भूगर्भातील पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. हे तिथे घडतेय, ज्या परिसरात जलविद्युत प्रकल्पांसाठी बोगदे खणले जात आहेत,  पर्यटकांसाठी चांगले दहा मीटर रुंदीचे महामार्ग बांधले जात आहेत. झालेच तर उत्तराखंडच्या दक्षिणेकडील, उत्तर प्रदेश सीमेलगतचा हरिद्वार वगैरे मैदानी भाग उंचीवरच्या तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रेल्वेमार्ग तयार होत आहेत. हा निसर्गाशी खेळ सुरू आहे. हा खेळ अतिसंवेदनशील हिमालयाच्या पर्यावरणाचा खंडोबा करील, अशी भीती आहे. 

उत्तराखंड ही सुरुवात आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हिमकवच लाभलेला वायव्येकडील हिंदुकुश पर्वतराजीपासून ते पूर्व, आग्नेयकडील म्यानमारपर्यंतचा अंदाजे २,४०० किमी लांबीचा संपूर्ण हिमालय पर्वतसमूह ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामांचा सामना करीत आहे. 

आपण संकटांचा योग्य तो धडा घेत नाही. आपत्तींमुळे आत्मपरीक्षण करीत नाही. निसर्ग ओरबाडणे थांबवत नाही, हेच खरे, अन्यथा अवघ्या दोन वर्षांपूर्वी चमोली, जाेशीमठ परिसरात नंदादेवी खोऱ्यातील हिमस्खलन व ढगफुटीमुळे झालेला प्रलय, दोनशेवर बळी, जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात शे-दीडशे जणांना जलसमाधी हे इतक्या लवकर विसरलाे नसतो. त्याही आधी २०१३ साली चार हजारांवर जीव घेणाऱ्या केदारनाथ, बद्रीनाथ परिसरातील हिमालयीन त्सुनामीचेही विस्मरण झाले नसते. निसर्गाच्या, पर्यावरणाच्या हाका विकासाच्या गोंगाटात विरून गेल्या नसत्या. १९९१ मधील उत्तरकाशी, १९९९ मधील चमोलीच्या भूकंपाने बेचिराख गावे पुन्हा तशाच आपत्तीच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलायला सरसावलो नसतो.

पर्यटन व पाण्यातून विजेची राक्षसी भूक 

- पर्यटन उत्तराखंडच्या उत्पन्नाचा आधार. 
- सव्वाकोटी लोकसंख्येच्या उत्तराखंडमध्ये वर्षाला तीन कोटींहून अधिक पर्यटक. 
- पर्यटन विकासासाठी चांगले रस्ते, रेल्वे, बहुमजली हॉटेल्सची उभारणी 
- गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार पवित्र ठिकाणांची, उत्तराखंडची छोटी चारधाम यात्रा करणारे अधिक 
- जलविद्युत निर्मिती हा उत्तराखंडच्या अर्थकारणाचा दुसरा मोठा स्रोत. 
२००० साली  
राज्यनिर्मितीवेळीच २१ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट 
- साडेचार-पाच हजार मेगावॉट निर्मिती सुरू 
- उत्तराखंडमध्ये सरकारी, खासगी, व्यावसायिक मिळून तब्बल तीनशेच्या आसपास छोटेमोठे जलविद्युत प्रकल्प 
२०१३ च्या
केदारनाथ प्रलयानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड जलविद्युत निगमचे ७० पैकी ४४ प्रकल्प थांबविले. 
- वीस प्रकल्प पूर्ण, सहा प्रगतिपथावर. स्थगित ४४ प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न 
- भौगोलिक स्थिती व नद्यांचे प्रवाह जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत पोषक. 
- दरीच्या तोंडावर धरण बांधले की मुबलक जलसाठा 
- टिहरी धरण हे याचे चांगले उदाहरण. त्याची उंची २६० मीटर, तर लांबी अवघी ५७५ मीटर. जलसाठा ४२ किलोमीटरपर्यंत. 
- हे भारतातील सर्वाधिक व जगात बाराव्या क्रमांकाचे उंच धरण. 
- तब्बल २,४०० मेगावॉट म्हणजे देशातील सर्वाधिक क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर

Web Title: Joshimath Issue The monstrous hunger of men, the crumbling foundation of God's land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.