काश्मीरी पंडितांवर अद्यापही अत्याचार सुरूच आहेत. भर दिवसा काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सातत्याने प्रतिक्रियाही येत आहेत. आता आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्ये संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
काश्मिरी पंडित भयभीत -केजरीवाल म्हणाले, आज संपूर्ण देश काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. काश्मीर हे त्यांचे घर आहे, त्यांना तेथे स्थायिक व्हायचे आहे. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर, तेथील काश्मिरी पंडित भयभीत आहेत. काश्मिरी पंडितांच्या निदर्शनांवर लाठ्या चालवणे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या पोडणे चुकीचे आहे.
कश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काश्मिरी पंडितांच्या समस्यांचा पाढा वाचताना म्हणाले, ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या, त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. ही राजकारण करण्याचा नाही, तर काश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ आहे. काश्मिरी पंडितांना संरक्षण हवे आहे. त्याच्या कुटुंबियाना तेथे सुरक्षित असल्याचे वाटत नाही.