महाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 23:03 IST2018-10-06T23:01:05+5:302018-10-06T23:03:25+5:30
नीलाकुरूंजी पर्यटकांच्या प्रतीक्षेत; केरळ पर्यटन विभागाची माहिती

महाप्रलयावर मात करत पर्यटनासाठी केरळ सज्ज
मुंबई : महाप्रलयानंतर उद्ध्वस्त झालेले केरळ पुन्हा एकदा उभे राहिल्याची माहिती केरळपर्यटन विभागाने शनिवारी दिली आहे. केरळ प्रशासनाने तातडीने यासंदर्भात दुरुस्तीची कामे हाती घेत रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडविल्या असून, पर्यटकांसाठी केरळ सज्ज असल्याचा दावाही केरळ पर्यटन विभागाने केला आहे. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित मेळाव्यात पर्यटन विभागाकडून पर्यटकांमध्ये सद्य:स्थितीबाबत जनजागृती केली जात आहे. पर्यटकांना या मेळाव्यात मोफत प्रवेश दिला जाणार असून रविवारी, ७ ऑक्टोबरला मेळाव्याचा शेवटचा दिवस आहे.
महाप्रलयामुळे रस्त्यांसह वीज आणि पाण्याची मोठी समस्या केरळमध्ये निर्माण झाली होती. मात्र प्रशासनाने तातडीची पावले उचलत या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळापर्यंत पोहोचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही. येथील जनजीवन सुरळीत झाले असून पर्यटकांनी मोठ्या संख्येने केरळला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे. केरळमधील आकर्षणांबाबत माहिती देण्यासाठी केरळ पर्यटन विभागातर्फे या मेळाव्यात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.
केरळसोबत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील राज्य शासनाच्या पर्यटन विभागांनीही आपापल्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी मेळाव्यात भाग घेतला आहे. केरळसह देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नीलाकुरूंजी उत्सवाचे आयोजन
तब्बल १२ वर्षांतून एकदाच फुलणाºया ‘नीलाकुरींजी’ यांचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू झाला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही फुले पूर्णपणे फुलतात. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या फुलांना पाहण्यासाठी रोज सरासरी ४ ते ५ हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात. या ऐतिहासिक उत्सवासाठी वन विभागाकडून दर १२ वर्षांतून एकदा विशेष परवानगी दिली जाते. याआधी हा उत्सव २००६ साली झाला होता.