ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. 300 कोटीहून जास्त थकबाकी मिळवण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. किंगफिशर एअरलाईन्स बंद पडल्याने 7 हजारापेक्षा जास्त कर्मचा-यांना फटका बसला आहे. त्यातील अनेक जणांची कायदेशीर लढाई लढण्याची ऐपतदेखील नाही.
सरकार आणि विरोधकांमध्ये सुरु असेलल्या शाब्दिक लढाईत आमचा मुद्दा बाजूला पडत असल्याचं कर्मचा-यांनी पत्रात म्हटलं आहे. सरकार आणि विरोधक मल्ल्या देश सोडून गेले यावरच भांडत असल्याचं त्यांचं म्हणण आहे. आपले खासदार दोन्ही सभागृहात किंगफिशर एअरलाईन्सलचा मुद्दा उचलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यातील एकजणही कर्मचा-यांच्या स्थितीवर बोलत नाही याच दुख: कर्मचा-यांनी व्यक्त केलं आहे.
किंगफिशर एअरलाईन्सने कर चुकवले असताना आम्हालाही आयकर विभागाच्या नोटीसा मिळत आहेत. कर्मचा-यांचं संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा काहीच फायदा होत नाही आहे. आम्हाला मोदींवर तसंच या सरकारवर विश्वास आहे. आमची विनंती वाया जाणार नाही अशा विश्वास या कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.