सिकंदर अनवारे, दासगावमहायुती तुटल्याने आणि आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने महाडमध्ये आता प्रमुख राजकीय पक्ष आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावणार आहेत. यापूर्वी महाडमध्ये शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढत होत होती. या बिघाडीमुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह मनसे, शेकाप आणि भाजप हे पक्ष देखील निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार झाले आहेत. यामुळे आता महाड विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढत होणार, असे चित्र आहे.महाड विधानसभा मतदार संघ हा मुळातच काँग्रेस विरोधी विचार सरणीचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. २००४ मध्ये माणिकराव जगताप यांनी या मतदार संघावर आपले अधिपत्य प्रस्थापित करुन हा मतदार संघ काँग्रेस विरोधी आहे. या दाव्याला छेद दिला होता. मात्र २००९ मध्ये विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा या मतदार संघावर भगवा फडकवला. विचारधारणेच्या वादात नेहमीच महाडमध्ये शिवसेना विरुध्द काँग्रेस अगर राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पहावयास मिळते. महाड विधानसभा मतदार संघामध्ये राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रिय आहेत, असे असले तरी गेल्या तीस वर्षाच्या महाडच्या राजकीय इतिहासात कायम राजकीय दृष्ट्या दुरंगी अगर तिरंगी लढत पहावयास मिळाले आहे.यंदा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी आघाडी आणि महायुतीचे चित्र स्पष्ट न झाल्याने महाडमध्ये राजकीय पेच निर्माण झाले होते. आघाडी आणि महायुतीमधील दिलजमाई गुरुवारी रात्री संपुष्टात आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद महाड विधानसभा मतदार संघामध्ये आजमावण्यासाठी सक्रिय झाले आहे. २५ सप्टेंबरला कोकण म्हाडाचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीच्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या आणि अपक्ष म्हणून असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हा उमेदवारी अर्ज दाखल करुन जगताप यांनी गोगावले यांना सरळ आवाहन दिले आहे. शुक्रवारी २६ सप्टेंबरला जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेच्यावतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गोगावले विरुध्द जगताप ही महाडच्या राजकीय इतिहासात काळ्या दगडावरची रेघ असताना तुटलेल्या महायुती आणि आघाडीच्या इतर घटक पक्षांनी उमेदवारी अर्ज घेऊन आपले अस्तित्व दाखवून प्रारंभ केला आहे.
महाडमध्ये पंचरंगी लढत
By admin | Published: September 26, 2014 11:26 PM