Eknath Shinde: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजप नेतृत्वाचं अभिनंदन केलं आहे. "दिल्लीतील भाजपचा विजय हा मोदींच्या गॅरंटीची जादू आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन," अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
"दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं 'आप'चे संकट या निमित्ताने दूर झालं आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही 'आपदा' टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद," अशा भावनाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचाही उल्लेख केला आहे. "घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.