Mamata Banerjee Slams BJP: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजपवर(BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी सोमवारी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाल्या की, "निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पैसे कोठून मिळतात याचे त्यांनी उत्तर द्यावे. निवडून आलेल्या राज्य सरकारांना पाडण्यासाठी काळा पैसा आणि केंद्रीय एजन्सीचा वापर केला जात आहे."
'घोटाळा झाला पण..."ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "भाजपचे नेते बेटी बचाओच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडले. भाजपवाले आम्हाला चोर म्हणतात. घोटाळा झाला आहे, पण डाव्या पक्षांनी केला आहे. पैसे खाण्याची त्यांची संस्कृती आहे, आमची नाही."
'हिम्मत असेल तर मला अटक करा'त्या पुढे म्हणाल्या की, ''हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आम्ही भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कोणताही पुरावा सादर करू शकले नाही. पण, इकडे मीडिया ट्रायल सुरू असून ते आम्हाला चोर म्हणत आहेत. हे सर्व षडयंत्र आहे, मीडियावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत. मी त्यांना आव्हान देते की, हिम्मत असेल तर मला अटक करा. मी तुरुंगातून लढेन आणि जिंकेन. तुम्ही माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,'' अशी टीका ममतांनी केली.
'महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला?'ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले, हा पैसा कुठून आला? तुम्ही झारखंडच्या आमदारांना पैसे देऊ केलेत. तुम्हाला झारखंड सरकार तोडायचे होते, मी ते थांबवले. अरविंद केजरीवाल म्हणतात, त्यांच्या आमदारांना पैसे देऊ केले आहेत. हा सगळा पैसा कुठून येत आहे," असा सवालही त्यांनी यावेळी केला.