हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार सत्तेत आल्यानंतर पक्षातील काही मंत्री त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करू लागले आहेत. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजित सिंह यांनी त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट स्थान नाकारल्याबद्दल जनतेसमोर नाराजी व्यक्त केली आहे. तर, कर्नाटकातून सात वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले रमेश जिगजिणगी म्हणाले की, त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारण्यात आले हा न्याय की अन्याय आहे हे मला माहीत नाही.
राव इंद्रजित सिंह हे २०१४ पासून एनडीए सरकारमध्ये मंत्री आहेत आणि हरयाणाचे एक मजबूत ओबीसी नेते आहेत. तर रमेश जिगजिणगी मागासवर्गीय समाजातून आहेत. राव इंद्रजीत सिंह म्हणाले की, यावेळीही त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती न मिळाल्याने हरयाणातील लोक नाराज आहेत.
रमेश जिगजिणगी म्हणाले की, सर्व उच्च वर्गातील नेते मंत्री झाले. याचा अर्थ मागासवर्गीयांनी भाजपला अजिबात पाठिंबा दिला नाही का? मला याचा खूप त्रास झाला आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी एनडीएला बहुमत मिळाले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम या मित्रपक्षांच्या सहकार्याने एनडीए सरकार स्थापन झाले आहे.
तक्रारी मांडण्याचे प्रकार वाढले
भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लोकांसमोर आपल्या तक्रारी मांडण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
आरएसएसने व्यक्तीपूजेबद्दल बोलताना म्हटले होते की, खरा सेवक तोच आहे जो अलिप्त राहतो आणि मी हे केले असा कोणताही अहंकार असत नाही.
आरएसएसच्या मुखपत्रातून महिनाभरात दोनदा पक्षाच्या कारभारावर टीका झाली आहे.
वर्षाअखेरीस हाेणार विधानसभा निवडणुका
या वर्षाच्या अखेरीस हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या १० जागा असलेल्या हरियाणामध्ये तीन केंद्रीय मंत्री आहेत. भाजपने ५ जागा जिंकल्या आहेत.
राव इंद्रजित सिंह यांच्याशिवाय मनोहरलाल खट्टर (कॅबिनेट) आणि कृष्ण पाल गुर्जर यांचा यात समावेश आहे.
लोकसभेच्या २८ जागा असलेल्या कर्नाटकला चार मंत्रीपदे देण्यात आली आहेत. कर्नाटकमध्ये भाजपने १८ जागा जिंकल्या आहेत.
प्रल्हाद जोशी आणि जनता दल सेक्युलरचे एच.डी. कुमारस्वामी (कॅबिनेट) तर शोभा करंदलाजे आणि व्ही. सोमन्ना राज्यमंत्री आहेत.