ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागालँडमधील दहशतवादी संघटनेसोबत करार केला असून यावरुन मोदी सरकार उद्धट असल्याचे स्पष्ट होते अशा शब्दांत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
गुरुवारी सलग तिस-या दिवशी काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरातील धरणे आंदोलन सुरु आहे. या निमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मोदींवर टीका केली. नागालँडमधील कराराविषयी सोनिया म्हणाल्या, हा करार ऐतिहासिक असेलही, पण ज्या राज्यांवर या कराराचा परिणाम होणार आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी विश्वासात घेतले नाही असे सोनिया गांधींनी निदर्शनास आणून दिले. सर्वांना सोबत घेऊन चालू असे मोदी सरकार नेहमी सांगते, मग आता काय झाले ? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तर संसदेत काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.