ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडी विकास असतो, प्रत्यक्षात मात्र ते आपलं दुकान चालवतात असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. जवाहरलाल नेहरूंची १२६ वी जयंती काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरी केली, त्यावेळी सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी मोदींवर टीका केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
जर मागासवर्गीय, मागास जाती जमाती आणि सगळ्या स्तरांवरील लोकांचा विकास झाला नाही तर मोदींच्या विकासाला काही अर्थ नाही असे सिंग म्हणाले.
नरेंद्र मोदींना संसदेमध्ये काहीही स्वारस्य नसून, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये पंतप्रधान व सरकारला किंचितही रस नसल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केली.
भारत हा सहिष्णू देश असल्याचे मोदी लंडनमध्ये बोलतात, भारतात नाही अशी टीकाही गांधी यांनी केली आहे.
काँग्रेस विविधतेचा पुरस्कार करते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी त्यांना वाटतं तसं सगळ्यांनी वागायला हवं अशी असल्याचं गांधी म्हणाले.
जवाहरलाल नेहरूंनी त्यांचं आयुष्य ऐषोआरामात व्यतित केलं असतं, परंतु त्यांनी सर्वस्व देशासाठी पणाला लावल्याचं सोनिा गांधी यांनी सांगितले. नेहरूंची प्रतिमा मलिन करण्याचं काम आज जे करत आहेत ते स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी घरात लपून बसले होते अशी टीकाही सोनियांनी हिंदुत्ववाद्यांवर केली आहे.