"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:18 IST2025-04-01T18:17:07+5:302025-04-01T18:18:23+5:30
Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली.

"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले
Waqf amendment bill 2025 news: 'जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण केले. जेव्हा विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले, तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने समितीच्या अध्यक्षानाच पाण्याची बॉटला मारण्याचा प्रयत्न केला होता', असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वक्फ सुधारणा विधेयकला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, "बघा, आता इतिहास तर बदलू शकत नाही. १९११ मध्ये जिन्ना साहेबांनी मुसलमान वक्फ कायदा आणला. १९५४ पर्यंत हा जिन्ना कायदा म्हणूनच ओळखला जातो. या देशात मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, हिंदूंसाठी वेगळा कायदा. यातून भारताचे विभाजन केले. पाकिस्तान बनला."
हेही वाचा >>२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'
"जेव्हा जेव्हा निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने मुस्लीम मतपेढीचे राजकारण आणि वेगळा पाकिस्तान बनवण्याच्या नादात वक्फमध्ये संशोधन करून मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मग १९९५ असो, २०१३ मध्ये. दोन्ही वेळा निवडणूक होणार होत्या", निशिकांत दुबे म्हणाले.
तृणमूलच्या कोणत्या खासदाराने बॉटल फेकण्याचा प्रयत्न केला?
"वक्फ सुधारणा विधेयक जेव्हा आले, तेव्हा संयुक्त संसदीय समितीच्या ६० बैठका झाल्या. वक्फ विधेयक आल्यानंतर विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. चर्चा झाली. जगदंबिका पाल (संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष) यांना कल्याण बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे खासदार) यांनी बॉटल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मी असं माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही", असे खासदार दुबे म्हणाले.
"आजही संसदेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये, त्या समितीचा मी सुद्धा सदस्य आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, विधेयकावर आठ तास चर्चा करू. त्यानंतर सभागृहाला वाटलं की वेळ वाढवावी, तर वाढवू. वेळबद्दल अजिबात अडचण नव्हती, हे आधीच ठरवून आले होते", अशी टीका दुबे यांनी केली.
"यांना मुस्लिमांना मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांच्या बुद्धीची कीव येते. वक्फ चांगले विधेयक आहे, ते मंजुर व्हायला पाहिजे", अशी निशिकांत दुबे म्हणाले.